गणपतीपुळे | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी (दि. २० जून) सकाळी अतिशय दुर्दैवी घटना घडली. देवदर्शन आणि पर्यटनासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटकांच्या गटातील पाच तरुण समुद्राच्या तीव्र लाटांमध्ये वाहून गेल्याची घटना घडली असून सायंकाळपर्यंत ते बेपत्ता होते. त्यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बीडकिंन येथील १९ जणांचा गट शुक्रवारी (दि. १९ जून) गणपतीपुळे येथे दाखल झाला होता. शनिवारी सकाळी स्वयंभू श्री गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर गटातील काही तरुण समुद्रस्नानासाठी उतरले. त्यावेळी समुद्रातील तीव्र प्रवाह आणि मोठ्या लाटांचा अंदाज न आल्याने पाच तरुण खोल पाण्यात ओढले गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, जीवरक्षक, होमगार्ड आणि पोलीस प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. मात्र समुद्रातील प्रचंड करंट आणि उधाणलेल्या लाटांमुळे शोधमोहीमेत अडथळे निर्माण होत आहेत. कस्टम विभाग तसेच स्थानिक मच्छीमारांच्या बोटींची मदतही शोधकार्यासाठी घेण्यात येत आहे.
समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणांमध्ये आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९) आणि यश रामेश्वर कांबळे (१९) (सर्व रा. बीडकिंन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. हे सर्व तरुण मित्रांसोबत देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पर्यटकांनी खोल समुद्रात जाणे टाळावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रकिनारी विशेष गस्त वाढविण्यात आली असून पर्यटकांना धोकादायक भागांबाबत सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समुद्रातील धोक्याच्या सूचना दुर्लक्षित करून खोल पाण्यात जाणाऱ्या पर्यटकांमुळे अशा घटना घडत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
