वर्धा | प्रतिनिधी :
वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध दारूविक्री आणि निर्मितीला आळा घालण्यासाठी सेवाग्राम पोलिसांनी दि. २० जून २०२६ रोजी विशेष “वॉशआऊट” मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत ६ लाख ८६ हजार ८०० रुपयांचा गावठी दारूसाठा व साहित्य नष्ट करण्यात आले असून चार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील मदणी, म्हसाळा आणि बरबडी परिसरात मोठ्या प्रमाणावर गावठी मोहाची दारू तयार करून साठवली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार करून संबंधित भागात पाळत ठेवली.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाग्राम पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांच्या नेतृत्वात सकाळी साडेपाच वाजल्यापासून एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान आरोपी अवचित मोरोतराव तेलंगे, निलेश उत्तमराव कौरती (दोघे रा. मदणी), शैलेश माटे (रा. नागसेन नगर, नालवाडी, वर्धा) आणि सुधाकर चितामण लेंडे (रा. बरबडी) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान पोलिसांनी नवीन कायद्यानुसार ‘ई-साक्ष’ (E-Sakshya) अॅप्लिकेशनचा वापर करून तांत्रिक पुरावेही संकलित केले.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक बांबर्डे, सहाय्यक फौजदार मारोती कातकर, पोलीस हवालदार सचिन सोनटक्के, किशोर पेटकुले, मनोज वाघमारे, धिरज मिसाळ तसेच होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला.
या अचानक राबविण्यात आलेल्या “वॉशआऊट” मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांच्यात खळबळ उडाली असून भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
