नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात आणि या प्रकारामुळे दलित युवकाच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने दोन दिवसीय तीव्र आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
या आंदोलनाची अधिकृत घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात येणार असून, कामगार नेते तथा ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाऊ सोनवणे (B.A. LL.B.) हे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून, त्यामुळे नदीपात्रात खोल खड्डे निर्माण झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे रोहन निलेश केदारे (वय १६) या दलित युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या प्रकरणात संबंधित वाळू माफियांवर तातडीने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, संपूर्ण घटनेची सीआयडी चौकशी करावी तसेच महसूल आयुक्त, नाशिक यांच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाचे स्वरूप
- दिनांक २५ जून २०२६
दुपारी २ वाजता दारणा नदी परिसरात जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. - दिनांक ३० जून २०२६
दुपारी २ वाजता नाशिक येथील महसूल आयुक्त कार्यालयावर दलित मृत्यू आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
हे आंदोलन कामगार नेते जगन भाऊ सोनवणे आणि महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. पुष्पाताई जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
दरम्यान, भुसावळ येथील संविधान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
नाशिक जिल्हाध्यक्ष महिला आघाडी संवदनाताई काळे गवळी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, संविधानवादी आणि आंबेडकरवादी जनतेने एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे.
यावेळी संविधान आर्मीचे जिल्हाध्यक्ष शार्दुल भाई, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मणियार साहेब तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.



