नेर प्रतिनिधी
नेर : शहरासह तालुक्यात अल्पवयीन मुला-मुलींकडून दुचाकी, मोपेड तसेच इलेक्ट्रिक वाहने चालविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, याकडे पालक आणि संबंधित प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष चिंतेचा विषय ठरत आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक तसेच वर्दळीच्या भागात शालेय वयातील मुले-मुली दुचाकी चालवताना सर्रास दिसून येत आहेत.
अनेकदा वाहन चालवणाऱ्या मुलांचे पाय जमिनीपर्यंत व्यवस्थित पोहोचत नसतानाही ते भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाहनांची संख्या वाढत असताना अल्पवयीन चालकांचे प्रमाणही वाढत असून त्यामुळे अपघाताचा धोका अधिक गंभीर बनला आहे.
विशेष म्हणजे काही पालक स्वतःच आपल्या मुलांना लहान वयात वाहन चालवण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे. घरगुती कामांसाठी किंवा शाळा-कॉलेजला जाण्यासाठी पालकांकडून अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी दिली जात असल्याने वाहतूक नियमांचे उघडपणे उल्लंघन होत आहे.
अनेक वेळा तीन जण एकाच दुचाकीवर बसून प्रवास करताना दिसतात. सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपली मुले कोणत्याही बाबतीत मागे राहू नयेत या मानसिकतेतून काही पालक वयाचा विचार न करता वाहन चालविण्यास परवानगी देतात. मात्र अशा निर्णयांचे गंभीर परिणाम भविष्यात दिसून येऊ शकतात. अपघात झाल्यास जीवितहानी, गंभीर दुखापत किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो.
स्थानिक नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा प्रकारांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने अल्पवयीन मुलांमध्ये निर्भयता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाहतूक नियमांनुसार वैध परवाना नसलेल्या अल्पवयीन व्यक्तीस वाहन चालवण्याची परवानगी देणे हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून अशा वाहनचालकांवर कारवाई करावी, त्यांच्या पालकांना समुपदेशनासाठी बोलवावे आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जागरूक पालक, कडक कायदा अंमलबजावणी आणि प्रभावी जनजागृती यांच्या माध्यमातून अल्पवयीन मुला-मुलींना अपघातांपासून सुरक्षित ठेवता येईल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.



