रिक्त पदे, औषध तुटवडा, रखडलेली विकासकामे; पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची मागणी
“केवळ पत्रव्यवहार करून जबाबदारी झटकली जात आहे” – अंकित नैताम यांचा गंभीर आरोप
पांढरकवडा | प्रतिनिधी
आदिवासीबहुल केळापूर, झरी-जामणी आणि पांढरकवडा परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा आधार असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्या अद्याप कायम असल्याचा आरोप युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांनी केला आहे.
संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर रुग्णालय प्रशासनाने लेखी उत्तर दिले असले तरी अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर केवळ पत्रव्यवहार सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर स्वरूपाची तडजोड होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, डायलिसिस सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, कर्मचारी निवासस्थानांचा प्रश्न तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत युवा टायगर फोर्सने सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासनाच्या उत्तरात बहुतांश प्रश्नांवर “वरिष्ठ कार्यालयास पत्र पाठविले आहे” किंवा “अंदाजपत्रक मागविले आहे” अशी भूमिका घेण्यात आल्याने प्रत्यक्षात प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचे स्पष्ट होत आहे.
“आदिवासी जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू”
युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय हे संपूर्ण आदिवासी पट्ट्यातील नागरिकांसाठी जीवनदायी केंद्र आहे. मात्र वर्षानुवर्षे रिक्त पदे, अपुऱ्या सुविधा आणि रखडलेली विकासकामे यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून केवळ पत्रव्यवहार करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कागदावर सोडविता येत नाही.”
पावसाळी अधिवेशनात प्रश्न गाजविण्याची मागणी
सध्या सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करून शासनाकडून स्पष्ट भूमिका मागावी, अशी मागणी युवा टायगर फोर्सने केली आहे. आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विशेष निधी उपलब्ध करून रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
शासनाकडे चौकशीची मागणी
अंकित नैताम यांनी पुढे सांगितले की, “उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत जिल्हाधिकारी, आरोग्य आयुक्त आणि आरोग्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून स्वतंत्र चौकशी करावी. केवळ कागदी अहवाल आणि पत्रव्यवहारावर समाधान मानले जाणार नाही. आदिवासी व ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्याशिवाय युवा टायगर फोर्सचा पाठपुरावा थांबणार नाही.”
मुख्य समस्या
- तज्ज्ञ डॉक्टरांची पदे अद्याप रिक्त
- औषध तुटवड्याबाबत नागरिकांच्या तक्रारी
- डायलिसिस सेंटरकडे जाणारा रस्ता रखडलेला
- कर्मचारी निवासस्थानांचा प्रश्न प्रलंबित
- पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची मागणी
“पत्रांवर पत्रे, पण प्रश्न जैसे थे”
“आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अन्यथा पुढील कायदेशीर लढा उभारला जाईल,” असा इशाराही अंकित नैताम यांनी दिला.
