सुरेगाव (गंगा), ता. नेवासा | प्रतिनिधी
सुरेगाव (गंगा) व बोरगाव परिसरात अलीकडेच घडलेल्या बिबट्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नेवासा येथील वनरक्षक डी. जी. धुळे यांनी हल्लाग्रस्त ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बिबट्याच्या हालचालींबाबत माहिती घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने जनावरांच्या सुरक्षेबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली.
वनरक्षक डी. जी. धुळे यांनी सांगितले की, बिबट्याच्या हालचालींवर वन विभागाकडून सतत लक्ष ठेवण्यात येत असून पुढील दोन दिवसांत पिंजरा बसविण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पत्रकार प्रल्हाद शिंदे, गोविंद माळवे, डॉ. प्रवीण औटी, विराज शिंदे, सुनील औटी, सतीश शिंदे, सुगम औटी, सुहास शिंदे, विष्णु शिंदे, सागर शिंदे आदी उपस्थित होते.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे सुरेगाव (गंगा) व बोरगाव परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.



