📍 श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील मुख्य तसेच ग्रामीण रस्त्यांच्या कडेला असलेल्या धोकादायक उघड्या विहिरी आणि मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन सादर केले.
आमदार ओगले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदारसंघातील अनेक रस्त्यांच्या कडेला संरक्षक कठडे नसलेल्या विहिरी व मोठे खड्डे आहेत. पावसाळ्यात हे खड्डे आणि विहिरी पाण्याखाली जात असल्याने वाहनचालक, शेतकरी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत आहे.
नुकतीच १४ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी येथे पिकअप वाहन विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथेही अशाच दुर्घटनेत ९ जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतींनी संयुक्त पाहणी करून धोकादायक ठिकाणांची नोंद घ्यावी, विहिरींभोवती संरक्षक कठडे किंवा कंपाऊंड उभारावे तसेच अपघातप्रवण भागात इशारा फलक व रिफ्लेक्टर लावण्यात यावेत, अशी मागणी आमदार ओगले यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



