दीव
पेण तालुक्यातील दीव गावातील ठाकूर आळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. संजय गणेश ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांतून परिसरात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
ठाकूर आळीमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः महिलांना घरगुती उपकरणे वापरताना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा वीज वितरण कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र प्रश्न कायम होता.
यानंतर गावातील परशुराम ठाकूर, नरदास ठाकूर, अरुण ठाकूर, बाळाराम ठाकूर, अनिल ठाकूर, गोपाल ठाकूर, समीरभाई ठाकूर, विशाल ठाकूर, आदेश ठाकूर आणि विनीत ठाकूर आदी ग्रामस्थांनी एकत्र येत हा प्रश्न थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे मांडला.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत संजय गणेश ठाकूर यांनी तातडीने पाठपुरावा करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही पूर्ण केली. त्यामुळे ठाकूर आळीतील वीजपुरवठा सुरळीत झाला असून नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ समीरभाई ठाकूर यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासूनचा विजेचा प्रश्न अखेर सुटला असून यासाठी आम्ही महावितरण प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानतो.”
या कामगिरीबद्दल दीव गावातील नागरिकांकडून महावितरण प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.







