शिरूर कासार | प्रतिनिधी :
शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील भिल्ल वस्तीमध्ये घडलेल्या घटनेनंतर परिसरात सामाजिक आणि शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या होत्या. विशेषतः आदिवासी भिल्ल समाजातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर एकलव्य भिल्ल समाज संघटना यांनी पुढाकार घेत १८ ते २० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी बीड, तहसीलदार शिरूर कासार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संघटनेने स्वतः पुढाकार घेत मुलांच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
सुमित्राताई दशरथ पवार आणि अॅड. सूर्यकांत दशरथ पवार यांनी या मुलांच्या राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. या मुलांना राजमाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केंद्रीय आदिवासी निवासी आश्रम शाळा, मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड येथे प्रवेश देण्यात आला आहे.
शाळेचे मुख्याध्यापक सुभाष कोहक सर आणि विशाल मराठी सर यांच्या देखरेखीखाली मुलांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची व्यवस्था करण्यात आली असून, मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, अशी ग्वाही शाळा प्रशासनाने दिली आहे.
या उपक्रमामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांना नवजीवन मिळाले असून आदिवासी समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक बांधिलकी जपत उचललेले हे पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
“शिक्षण हीच खरी प्रगतीची वाट” या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवत एकलव्य भिल्ल समाज संघटना यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी केलेले कार्य सर्व स्तरांतून कौतुकास्पद मानले जात आहे.



