गोंडपिपरी : प्रतिनिधी
तालुक्यातील राजकीय वारसा लाभलेल्या आणि ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या विठ्ठलवाडा गावात गेल्या तब्बल १२ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्याची सुरुवात होताच गावातील वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
उन्हाळा संपत आला असला तरी उकाडा कायम असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच रात्री-अपरात्री तासन्तास वीज गायब होत असल्याने लहान मुले, वृद्ध, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दिवसभर कष्ट करून परतणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांना रात्री शांत झोप घेणेही कठीण झाले आहे.
गावातील नागरिकांच्या मते, तांत्रिक बिघाड आणि वादळी वाऱ्यांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. मात्र या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात महावितरण प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गावात विजेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी जबाबदार कर्मचारी उपलब्ध नसल्याने संपूर्ण व्यवस्था रामभरोसे सुरू असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
सततच्या बत्तीगुलमुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “गावातील ही वीज समस्या नेमकी कधी सुटणार?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
बॉक्स
“महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जनतेचे हाल”
“गोंडपिपरी येथील महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विठ्ठलवाडा येथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या १२ दिवसांपासून या भागात रात्रभर वीजपुरवठा बंद राहत आहे. गावातील विजेची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी जणसेवक कार्यरत नसल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मग आम्ही दाद मागायची कोणाकडे?”
— नितीन काकडे, माजी सरपंच, विठ्ठलवाडा
