अवघ्या सहा महिन्यांत विकासकामांना गती; महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर
प्रतिनिधी
शिरूर :
शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत लोकाभिमुख, विकासाभिमुख आणि संवेदनशील कार्यपद्धतीची वेगळी छाप निर्माण केली आहे. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांवर स्वतः लक्ष ठेवण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे शहरभर त्यांचे कौतुक होत आहे.
शहरातील विविध प्रभागांमधील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता, संरक्षण भिंती, पथदिवे आणि नागरी सुविधांबाबतच्या समस्या नगरसेवक व नागरिकांकडून त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातात. त्या प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित ठिकाणी स्वतः भेट देतात, अधिकाऱ्यांसोबत पाहणी करतात आणि कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देतात. त्यामुळे अनेक विकासकामांना गती मिळाली आहे.
महिला सक्षमीकरणासाठीही नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. एकल महिलांसाठी मार्गदर्शन, शासनाच्या योजनांची माहिती, स्वावलंबनासाठी प्रोत्साहन तसेच महिलांच्या हक्कांविषयी जनजागृती कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे.
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्भया पथकाबाबत जनजागृती करण्यासाठीही नगराध्यक्षा पाचर्णे यांनी पुढाकार घेतला आहे. शहरात महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत विशेष मोहिमा राबविण्यात येत असून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यावर भर दिला जात आहे.
तसेच नगरपरिषदेच्या बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, संरक्षण भिंती आणि इतर विकासकामांची नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे स्वतः पाहणी करून गुणवत्तापूर्ण कामांवर भर देत आहेत. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्या अधिकाऱ्यांशी नियमित आढावा बैठका घेत आहेत.
विशेष म्हणजे, त्या केवळ कार्यालयीन बैठकीपुरत्या मर्यादित न राहता थेट नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकतात. महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला तत्परतेने कामाला लावत आहेत.
पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग, विकासकामांतील गुणवत्ता आणि तातडीची निर्णयक्षमता यामुळे नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या नेतृत्वाविषयी नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे.
अवघ्या सहा महिन्यांत विकासकामांना दिलेली गती, महिला सक्षमीकरणासाठीचे प्रयत्न, स्वच्छता अभियान, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोकांशी जपलेला जिव्हाळ्याचा संवाद यामुळे त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून आगामी काळात शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
चौकट
“शिरूर नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय, महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवरील भर यामुळे नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांची लोकाभिमुख कार्यशैली शहरासाठी विकासाचा नवा आदर्श ठरत आहे.”
