पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प समोर आला असून, पालघरमधील कोरे बीच (Kore Beach) परिसरात देशातील पहिले ‘ऑफशोर विमानतळ’ उभारण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या पालघर दौऱ्यात प्रस्तावित जागेची पाहणी करून प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
प्राथमिक व्यवहार्यता अहवालात (Pre-feasibility Report) हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या आणि विकासाच्या दृष्टीने योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
वार्षिक ९ कोटी प्रवाशांची क्षमता
जपान आणि हाँगकाँगच्या धर्तीवर समुद्रात उभारण्यात येणाऱ्या या विमानतळातून दरवर्षी सुमारे ९० दशलक्ष म्हणजेच ९ कोटी प्रवाशांची वाहतूक हाताळण्याची क्षमता प्रस्तावित आहे.
तब्बल ४५ हजार कोटींची गुंतवणूक
या भव्य प्रकल्पासाठी अंदाजे ४५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, राज्यातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प ठरणार आहे.
कनेक्टिव्हिटीचा महासंगम
प्रस्तावित विमानतळ आगामी वाढवण बंदर, बुलेट ट्रेनचे बोईसर स्टेशन आणि उत्तन-विरार सागरी सेतूशी थेट जोडले जाणार आहे. त्यामुळे पालघर जिल्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे.
‘चौथी मुंबई’ म्हणून पालघरची ओळख
या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्याचा औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकास मोठ्या प्रमाणात होणार असून, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. परिणामी पालघरची ‘चौथी मुंबई’ म्हणून नवी ओळख निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला राज्याच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले असून, पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
