रिसोड : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवार दि. ३० जून रोजी रिसोड नगरीत आगमन होत आहे. पालखीच्या स्वागतासाठी मार्केट कमेटीसह विविध सामाजिक संस्था, भाविक आणि नागरिकांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे.
पालखी सोहळ्यासोबत सुमारे ७०० ते ८०० वारकरी टाळ, मृदंग, पताका आणि “गण गण गणात बोते… जय गजानन”च्या अखंड गजरात सहभागी होणार आहेत. वारकऱ्यांच्या आगमनामुळे शहरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालखीचे शहरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री संत गजानन महाराजांची विधिवत पूजा, आरती आणि दर्शनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
भाविकांसाठी भव्य महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून सर्वप्रथम वारकऱ्यांना महाप्रसाद दिला जाणार आहे. त्यानंतर भाविकांनाही महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. तसेच पालखी मार्गावर विविध ठिकाणी चहा, फराळ, पिण्याचे पाणी आणि अन्य सेवांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक भाविकांकडून वारकऱ्यांना भेटवस्तूंचेही वितरण करण्यात येणार आहे.
दुपारनंतर पालखीचा रिसोड येथे मुक्काम होणार असून, ही परंपरा पालखी सोहळ्याचे एक वैशिष्ट्य मानली जाते. पालखी आगमनाच्या निमित्ताने शहरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
