कळंबोली | प्रतिनिधी
कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि अनुभवी अधिकारी श्री. तानाजी महादेव नारनवर यांनी पदभार स्वीकारला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर बढती मिळाल्यानंतर श्री. राजेंद्र कोते यांनी पदभार नारनवर यांच्याकडे सुपूर्द केला.
श्री. तानाजी नारनवर यांनी आपल्या कारकिर्दीत कठोर व निष्पक्ष कार्यपद्धतीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी रायगड जिल्हा विशेष शाखा, नागोठणे, वडखळ, सावंतवाडी तसेच रायगड नियंत्रण कक्ष अशा विविध ठिकाणी यशस्वीपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. विशेषतः अवैध धंद्यांवर कारवाई, गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणे आणि गुन्हेगारांवर प्रभावी अंकुश ठेवण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
नागरिकांशी संवाद वाढविणे, पोलीस दलाविषयी विश्वास दृढ करणे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करणे, हे त्यांच्या कार्यशैलीचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना तानाजी नारनवर यांनी महिला व बाल सुरक्षा, अमली पदार्थ व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई, संघटित गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, तसेच नागरिकांना सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण उपलब्ध करून देणे ही आपल्या कार्यकाळातील प्रमुख उद्दिष्टे असल्याचे स्पष्ट केले.
त्यांच्या नियुक्तीमुळे कळंबोली आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होईल, तसेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण येईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
