पारंपरिक वेशभूषा, धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणाने परिसर झाला मंगलमय
कळंबोली | प्रतिनिधी : श्रीनाथ लाड | दि. २९
कळंबोली परिसरात वटपौर्णिमा हा सण महिलांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला. कळंबोलीतील विविध सेक्टरमधील वडाच्या झाडांजवळ सकाळपासूनच सुवासिनी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
महिलांनी पारंपरिक साडी, नथ आणि दागिने परिधान करून वडाच्या वृक्षाची विधिवत पूजा केली. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी महिलांनी वटसावित्रीची कथा श्रवण केली तसेच एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत सणाचा आनंद लुटला.
कळंबोलीतील विविध सोसायट्या, मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अनेक महिलांनी पारंपरिक संस्कृती आणि रूढी-परंपरा जपत वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांमध्ये आनंदाचे आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले असून, भारतीय संस्कृतीतील परंपरा जपण्याचा संदेश या उत्सवातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
“वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून, वृक्षांचे महत्त्व ओळखून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा दिवस आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, हाच या सणाचा खरा सामाजिक संदेश आहे,” अशी भावना यावेळी अनेक महिलांनी व्यक्त केली.

