शिरजगाव कसबा | प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिरजगाव कसबा परिसरात दि. २९ जून रोजी दुपारपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
सायंकाळी पाच वाजल्यापासून पावसाचा जोर अधिक वाढला. विजांचा कडकडाट आणि वादळी परिस्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला. शिरजगाव परिसरातील मेगा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, शिरजगावलगत असलेल्या पांढरी गावातील दोन व्यक्ती पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि स्थानिकांकडून तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे परिसरातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आवश्यक नसल्यास नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे सांगितले आहे.
