५ जुलैला कुरुंदवाडमध्ये सर्वपक्षीय मेळावा; आंदोलनाचे रणशिंग फुंकणार
प्रतिनिधी :
कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आता निर्णायक लढा उभारला जाणार असून, या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी कुरुंदवाड येथे सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे संस्थापक अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुरुंदवाड येथील टेनिस क्लब हॉलमध्ये आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. पंचगंगा नदीत कोणत्याही प्रकारचे प्रदूषित पाणी सोडू नये, या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील गावांना सोबत घेऊन आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रोसेस उद्योगांमधून विनाप्रक्रिया सोडले जाणारे विषारी रासायनिक पाणी हे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनाच्या दबावामुळे काही काळ हे प्रदूषित पाणी नदीत येणे थांबले होते आणि त्यामुळे पंचगंगा काही प्रमाणात स्वच्छ झाली होती. मात्र नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करायची असेल तर हे रासायनिक पाणी पूर्णपणे रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी
दि. २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी कोणतीही ठोस कृती करण्यात आली नाही, असा आरोप करत चुडमुंगे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. प्रदूषण करणाऱ्या घटकांना प्रशासनाकडून अप्रत्यक्ष सहकार्य मिळत असल्याचे चित्र बैठकीत दिसून आले. त्यामुळे आता आरपारची लढाई उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार-आमदारांना निमंत्रण
५ जुलै रोजी होणाऱ्या मेळाव्यास हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘प्रोसेस’चे पाणी ओढ्यातच
शिरोळ तहसीलदार कार्यालयात २ जून रोजी झालेल्या बैठकीत १६५ एकर शेतीची पडताळणी करून निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार २२ जून रोजी झालेल्या पडताळणीत १०६ एकरांपैकी केवळ ३३ एकर शेती पाणी घेण्यासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. त्या अनुषंगाने ३३ एकर शेतीला पुरेल इतक्याच प्रोसेस सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र इचलकरंजीतील सर्व प्रोसेस पूर्ण क्षमतेने सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला.
प्रोसेसचे पाणी शेतीपेक्षा ओढ्यांमध्येच जास्त प्रमाणात सोडले जात असल्याचे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अहवालातून स्पष्ट केले आहे. कोणताही शेतकरी हे प्रदूषित पाणी घेण्यास तयार नसताना कागदोपत्री शेती दाखवून प्रत्यक्षात ओढ्यात पाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोपही चुडमुंगे यांनी केला.
इचलकरंजीच्या आमदारांवर टीका
इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे हे प्रदूषण करणाऱ्या प्रोसेस मालकांची बाजू घेत असल्याचा आरोप करत चुडमुंगे म्हणाले, “इचलकरंजीच्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आमदारांनी प्रोसेस चालकांना कायद्याने वागण्यास भाग पाडावे. आम्हाला शहाणपणा सांगण्यापेक्षा प्रदूषण रोखण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी.”
या पत्रकार परिषदेला दीपक पाटील, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर, गोपाळ चव्हाण, सर्जेराव बाबर, आप्पासो कदम, आयुब पट्टेकरी, पोपट राणे, संदीप चौगुले, बंटी माळी, जितेंद्र टाकळे, रशीद मुल्ला, संभाजी माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
