मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
शहादा, दि. ३० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ०२ शहादा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक गिरासे यांनी केले. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार संभाजी पाटील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना दीपक गिरासे म्हणाले की, या विशेष पुनरीक्षण मोहिमेचे विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. मोहिमेचा पहिला टप्पा २० जून २०२६ पासून सुरू झाला असून दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर संकलित माहितीच्या आधारे ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या नोंदी तपासण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आवश्यक त्या प्रकरणांमध्ये संबंधितांना नोटिसा बजावून सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर प्राप्त दावे व हरकतींवर सखोल छाननी करून ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
शहादा विधानसभा मतदारसंघात एकूण ३६६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये शहादा तालुक्यातील २२७ आणि तळोदा तालुक्यातील १३९ मतदान केंद्रांचा समावेश आहे. ही मोहीम प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविण्यासाठी निवडणूक विभागाकडून विशेष बूथ लेव्हल अधिकारी (BLO) नियुक्त करण्यात आले आहेत.
मोहिमेदरम्यान बीएलओ मतदारसंघातील प्रत्येक घराला किमान तीन वेळा भेट देऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे, अचूक पत्ता, वयाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच नवीन मतदार नोंदणी, मयत किंवा दुबार नावे वगळणे, मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करणे आदी कामांसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत शहादा व तळोदा तहसील प्रशासनाने युवक, महिला आणि सर्व मतदारांना या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
