विधानसभेत आमदार हेमंत ओगले आक्रमक
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर मतदारसंघात जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात अनेक योजना केवळ कागदावर पूर्ण झाल्याचा आरोप आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेत केला. “प्रत्यक्षात फक्त पाइप गाडण्याचे काम झाले असून एकही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे शासनाचे करोडो रुपये वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे,” असे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले.
मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधताना आमदार ओगले यांनी प्रशासनाच्या कारभारावर कडक शब्दांत टीका केली. या योजनांमधील त्रुटींची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
विधानसभेत बोलताना त्यांनी सांगितले की, श्रीरामपूर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत ४३ योजना आणि राहुरी तालुक्यात १८ योजना पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत ९ योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र अनेक ठिकाणी पाण्याचा मुख्य स्रोत निश्चित न करता केवळ पाइपलाइन टाकण्याची घाई करण्यात आली.
यामुळे संबंधित कंत्राटदार आता वाढीव खर्चासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “जुनी कामे पूर्ण न करता नव्याने निधी मागण्याचा प्रकार गंभीर आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत १५ जुलै २०२६ रोजी या विषयावर विशेष बैठक पार पडली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे आमदार ओगले यांनी सांगितले.
जुनी अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय संबंधित ठेकेदारांना कोणतीही सुधारित प्रशासकीय मान्यता देऊ नये, अशी ठाम मागणी आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेत केली.
