संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात अर्जुन शिरसाठ हा युवक जखमी झाला आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, मानवी हल्ल्याच्या या पहिल्याच घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काकडवाडी येथील मुळे वस्तीवरील शांताराम मुळे यांच्या घराजवळील शेतातील गवताळ कोरड्या भागात बिबट्या दबा धरून बसला होता. अर्जुन शिरसाठ हा युवक मोटारसायकलवरून जात असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली.
या हल्ल्यात अर्जुन शिरसाठ यांच्या पाठीवर बिबट्याच्या नखांचे ओरखडे उमटले असून ते थोडक्यात बचावले. जखमी युवकाला तातडीने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
काकडवाडी परिसरात यापूर्वी बिबट्याकडून शेळ्या, गाई आणि इतर पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, मानवावर झालेल्या या पहिल्याच हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमनेर वनविभागाने तातडीने घटनास्थळी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच जखमी युवकाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च वनविभागाने उचलावा, अशी मागणीही पुढे आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी चारा कापताना, शेतात काम करताना तसेच प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी केले आहे.
