अंबरनाथ प्रतिनिधी
अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये नालेसफाईचे काम अपूर्ण आणि निकृष्ट झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिसरातील नाल्यांमधून केवळ प्लास्टिक कचरा उचलण्यात आला, मात्र गाळ काढण्यात आलेला नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका गायकर यांनी जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने काही प्रमाणात कचरा हटवला, परंतु नाल्यांमधील गाळ तसाच राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक आत्माराम तांबे यांचे चिरंजीव संकेत आत्माराम तांबे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिसरात आणून नालेसफाईचे वास्तव दाखवून दिल्याचे सांगण्यात आले. अवघ्या अर्धा तास पाऊस झाल्यानंतर नाले तुडुंब भरून वाहत असल्याने नालेसफाईचा दावा फोल ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी संकेत तांबे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना इशारा देत, “जर तातडीने योग्य पद्धतीने नालेसफाई झाली नाही, तर नाल्यातील कचरा काढून नागरिकांसह नगरपरिषदेच्या आवारात टाकण्यात येईल,” असा इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य नालेसफाई न झाल्यास नागरिकांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
