अंबरनाथ प्रतिनिधी
अंबरनाथ नगरपरिषदेच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल पावसाने केली असून, काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे विमको नाका परिसरात तुडुंब पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
थोड्याशा पावसातच नाल्यांमधील पाणी थेट कल्याण-बदलापूर मार्गावर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली.
स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेच्या कारभारावर संताप व्यक्त करत नालेसफाईच्या कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “ठेकेदारांनी केवळ बिले उचलली, प्रत्यक्षात नालेसफाई झालीच नाही,” असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असताना, प्रत्यक्षात थोड्याशा पावसात शहर जलमय होत असल्याने नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करावी तसेच नालेसफाईच्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
