जामनेर प्रतिनिधी — वाघारी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेली विकास कामे गेल्या सात महिन्यांपासून बंद पडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते, गटारे, पेव्हर ब्लॉक आदी कामे अर्धवट अवस्थेत पडून असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, कामांची सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांतच ती अचानक थांबवण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कामे पुन्हा सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे परिसरात चिखल, साचलेले पाणी आणि अस्वच्छता वाढली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने या रखडलेल्या कामांची तातडीने दखल घेऊन विकासकामे त्वरीत सुरू करावीत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
