माढा प्रतिनिधी :
माढा तालुक्यातील रणदिवेवाडी, वेताळवाडी परिसरातील शेतकऱ्यांची उभी पिके सध्या विजेच्या कमी दाबामुळे धोक्यात आली असून, महावितरणच्या दुर्लक्षामुळे पिके जळून चालल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
परिसरातील अनेक विहिरींमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने मोटारी सुरू होत नाहीत. परिणामी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने उभी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महावितरणकडून सातत्याने कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून, अनेकदा अचानक वीज खंडित होत आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याशिवाय वाड्या-वस्त्यांवरील सिंगल फेज लाईटही बंद असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तात्काळ वाड्या-वस्त्यांवरील वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कमी दाबाचा प्रश्न सोडवावा, नियमित वीजपुरवठा करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.
