धामोरी (वार्ताहर)
अधिष्ठान अडबंगीनाथ महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तसेच त्यांची जन्मभूमी, तपोभूमी आणि दीक्षाभूमी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र धामोरी (ता. कोपरगाव) येथून आषाढी वारीनिमित्त निघणाऱ्या पारंपरिक अडबंगीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे यंदाही मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आले आहे.
सन २०२६ च्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी निघणाऱ्या या दिंडीचे प्रस्थान मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री गोरक्षनाथ मंदिर, धामोरी येथून होणार आहे. त्यानंतर बुधवार, दि. ८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता दिंडीचा मुख्य प्रवास पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.
टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष, अभंग-भजन आणि विठ्ठलनामाच्या गजरात हजारो वारकरी भक्त पायी चालत श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या भक्तिमय सोहळ्यात धामोरीसह नायगाव, देवी, मोरवी, सांगवी, भुसार, रामवाडी, भोजाडे, कानेगाव, वारी, सावळी विहीर, प्रवरानगर, राहाता, मंजूर तसेच नाशिक जिल्ह्यातील मानोरी, कानळद, शिरवाडे, वाकत, पानेवाडी, भवरी, भालूर, शिंगवे, नांदगाव, नगरसूल, वाईभूती, खरवंडी, भरवस, वाहेगाव, देशमाने, मुखेड तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील चोर, वाघलगाव, महांकाळ आणि वाडगाव परिसरातील असंख्य वारकरी भाविक सहभागी होणार आहेत.
ही दिंडी केवळ धार्मिक परंपरेचे प्रतीक नसून वारकरी संप्रदायातील एकात्मता, भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा आध्यात्मिक सोहळा मानला जातो. अनेक वर्षांची अखंड परंपरा जपत हा दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न होत असून दरवर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
दिंडीचे संस्थापक, मुख्य प्रवर्तक तथा मार्गदर्शक ह.भ.प. पांडुरंग बाबा भाकरे यांनी परिसरातील सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना या पवित्र दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन विठ्ठलनामाचा आनंद लुटण्याचे तसेच सोहळ्याची शोभा वाढविण्याचे आवाहन केले आहे.
