शहापूर प्रतिनिधी :
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून खाजगी शाळांकडून आर्थिक आणि मानसिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित शाळांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून देण्यात आला आहे.
याबाबत गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती शहापूर कार्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले असून, शासनाच्या स्पष्ट परिपत्रकानंतरही अनेक खाजगी शाळांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, RTE अंतर्गत मोफत शिक्षणाचा लाभ मिळत असतानाही विद्यार्थ्यांकडून पुस्तके, गणवेश, शूज, स्टेशनरी तसेच SMS चार्जेसच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत. काही शाळांकडून ठराविक दुकानांतूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात असून, बाजारभावापेक्षा जास्त दर आकारले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अनेक गरीब पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे लागत आहे, तर काहींना दागिने गहाण ठेवण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे. शासनाने स्पष्ट आदेश दिलेले असतानाही शाळांकडून नियम धाब्यावर बसवले जात असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत २५ टक्के RTE कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत कोणत्याही प्रकारची फी, पुस्तके, गणवेश किंवा स्टेशनरीसाठी पैसे घेता येत नाहीत. या सर्व खर्चाची भरपाई शासनाकडून संबंधित शाळांना केली जाते. तसेच कोणत्याही विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करू नये, असेही शासनाच्या विविध परिपत्रकांत स्पष्ट करण्यात आले आहे.
तरीदेखील शहापूर तालुक्यातील काही खाजगी शाळांकडून पालकांवर दबाव टाकून आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही पालकांनी असा आरोप केला आहे की, मागण्या पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातो किंवा त्यांच्याकडे दुजाभावाने पाहिले जाते.
या सर्व प्रकारामुळे शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण झाल्याची भावना पालकांमध्ये व्यक्त होत असून, शासनाने अशा शाळांचे ऑडिट करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास संबंधित शाळांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणी शिक्षण विभाग आणि शासन काय भूमिका घेणार, याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
