उपविभागीय अधिकारी खडसे आणि तहसीलदार दिवटे यांनी कृषी दिनानिमित्त केली पेरणी
खामगाव, जि. बुलढाणा : कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना एक सुखद आणि प्रेरणादायी अनुभव देत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी थेट शेतात उतरून पारंपरिक पद्धतीने पेरणी केली. सहसा कार्यालयीन कामकाज आणि फाईलींपुरते मर्यादित असलेले प्रशासन यावेळी काळ्या मातीत उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांनी खांद्यावर टॉवेल घेत बैलजोडीच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने नांगरणी व पेरणी करत कृषी संस्कृतीप्रती आपली बांधिलकी आणि संवेदनशीलता दाखवून दिली. प्रशासनाच्या या जनहितैषी उपक्रमाचे उपस्थित शेतकऱ्यांनी कौतुक केले.
या उपक्रमामागील उद्देश म्हणजे प्रशासन प्रत्येक परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, हा विश्वास दृढ करणे आणि कृषी क्षेत्राबद्दल समाजात सकारात्मक संदेश पोहोचवणे हा होता.
यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत खरीप हंगामातील परिस्थितीचा आढावा घेतला. पेरणीची प्रगती, शेतातील ओलावा, पावसाची स्थिती तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.
शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या उपक्रमामुळे आपले मनोबल वाढल्याची भावना व्यक्त केली. तसेच शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील विश्वास व सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्हीसुद्धा शेतकरी कुटुंबातून आलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत आणि त्यांच्यासमोरील अडचणी आम्हाला चांगल्या प्रकारे समजतात. प्रशासन नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहील आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.”
