प्रतिनिधी —
दूध व्यवसायाबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांमुळे शेतकरी व दुग्ध व्यवसायिकांना मोठा फटका बसत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. काही भेसळखोरांमुळे संपूर्ण दुग्ध व्यवसायाला दोष देणे चुकीचे असून, यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेतकरी व उद्योजकांची बदनामी होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून गोमातेची सेवा करतो, जनावरांची काळजी घेतो आणि घरोघर तसेच दूध संकलन केंद्रांमार्फत शुद्ध दूध पुरवठा करतो. मात्र, “दूध म्हणजे विष”, “संपूर्ण दूध व्यवसाय भेसळीवर चालतो” अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
दुग्ध व्यवसायिकांचे म्हणणे आहे की, बाजारात भेसळ करणाऱ्यांवर निश्चितच कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र, काही मोजक्या भेसळखोरांमुळे संपूर्ण दुग्ध व्यवसायाला बदनाम करणे अन्यायकारक आहे. याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकरी, दूध विक्रेते आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित हजारो कुटुंबांवर होत आहे.
दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शासनाने भेसळखोरांविरोधात कठोर पावले उचलावीत, तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व दुग्ध व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.
