मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालयात “वऱ्हाड विकास”चा ४० वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
अमरावती (प्रतिनिधी) – फुले-शाहू-आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील समर्थ साक्षीदार असलेल्या “वऱ्हाड विकास” मासिकाच्या ४० व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चैतन्य कॉलनी, अमरावती येथे दि. २ जुलै २०२६ रोजी उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर होते. प्रमुख उपस्थितीत “वऱ्हाड विकास” चे संपादक सत्यशोधक समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड, ज्येष्ठ साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले, नाट्यकर्मी प्रा. पुंडलिक भामोदे, लेखिका समाजभूषण डॉ. निर्मला भामोदे, प्राचार्य गजानन वानखडे, सुषमा राम शेकोकार आणि गोविंदराव फसाटे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ, वृक्षरोप व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांनी त्यांच्या ‘निखारा’ काव्यसंग्रहातील ‘क्रांतिज्योती’ हे वंदनगीत तसेच ‘वऱ्हाड विकास’ या स्वरचित अभंगाच्या सादरीकरणातून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या गायनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.
याप्रसंगी प्रा. श्रीकृष्ण बनसोड संपादित “वऱ्हाड विकास” मासिकाच्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात प्रा. श्रीकृष्ण बनसोड म्हणाले, “फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाचन संस्कृती समृद्ध करण्याचे कार्य वऱ्हाड विकास करीत आहे. भाकर माणसाला जगवते, पण वाचनाने जीवन कसे जगावे हे समजते. वाचनामुळे मस्तक घडते आणि ते कोणापुढे नतमस्तक होत नाही.”
अध्यक्षीय भाषणात मधुकरराव अभ्यंकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान आणि लोकशाही शासन प्रणाली दिली. मात्र आज लोकशाही धोक्यात आली असून तिचे वस्त्रहरण सुरू आहे. अशा काळात वृत्तपत्र चालविणे म्हणजे सतीचे वाण आहे आणि वऱ्हाड विकासच्या माध्यमातून प्रा. बनसोड यांनी हे कार्य समर्थपणे उभे ठेवले आहे.”
प्रमुख अतिथी प्रा. अरुण बुंदेले यांनी “वंचितांच्या समस्यांना वाचा फोडणारे मासिक म्हणजे ‘वऱ्हाड विकास’” असे म्हणत मासिकाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. तर डॉ. निर्मला भामोदे यांनी “फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वऱ्हाड विकास करत आहे,” असे सांगितले.
नाट्यकर्मी प्रा. पुंडलिक भामोदे यांनी “वऱ्हाड विकासने अनेक नवोदित साहित्यिकांना घडविले असून वाचन संस्कृती समृद्ध करण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे,” असे मत व्यक्त केले.
यावेळी नाट्यकर्मी सुषमा राम शेकोकार यांनी “मी सावित्रीबाई फुले बोलते” हा प्रभावी नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय श्रीखंडे यांनी केले तर प्राचार्य गजानन वानखडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक सतीश फुंडकर, प्रा. सुधाकर गावंडे, राजू वाकोडे, कु. शीतल मानेकर, कु. किरण गुर्जर, शिक्षकेतर कर्मचारी मनोज शिरभाते, बाबुराव चक्रे, विद्यार्थी तसेच वऱ्हाड विकासचे वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
