अमरावती –
नागपूर येथील संकलनकार व लेखक विभूतीचंद्र गजभिये संपादित ‘रवि दलाल यांच्या निवडक कथा’ या कथासंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात (मुकुंदराव आंबेडकर चौक, आवळे बाबू चौक) सकाळी १०.३० वाजता हा वाङ्मयीन सोहळा उत्साहात पार पडणार असून, साहित्य क्षेत्रात या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी (I.A.S.) तथा संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. ई. झेड. खोब्रागडे राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर प्रदेशचे भूमी अभिलेख उपसंचालक मा. डॉ. लालसिंग मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. बाळासाहेब काळे आणि मा. विकास राऊत उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. रवि दलाल आणि मा. अशोकभाऊ सरस्वती बौद्ध यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
यावेळी मा. अॅड. हंसराज भांगे, मा. रामभाऊ डोंगरे आणि मा. वीरेंद्रबाबू इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत रंगणाऱ्या या कार्यक्रमात दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक, उद्घाटनपर भाषणे तसेच ‘रवि दलाल यांच्या निवडक कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे वैचारिक मार्गदर्शन होऊन अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप होईल.
मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारा हा वाङ्मयीन सोहळा ठरणार असून नागपूरसह परिसरातील साहित्यप्रेमी, वाचक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
