प्रतिनिधी :-
पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांकडून शहरात संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आलेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक प्रशासनाविरोधात एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होणार असल्याने शहरातील मुख्य रस्ते, पालखी मार्ग, प्रदक्षिणा मार्ग तसेच विठ्ठल मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या, जाहिरात फलक आणि कायमस्वरूपी झालेले अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येत आहे.
मात्र, जेसीबीच्या सहाय्याने अचानक अतिक्रमण हटवण्यात आल्याने अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. “व्यापाऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्याची भरपाई कोण देणार?” असा सवाल नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी उपस्थित केला.
कारवाईनंतर नगराध्यक्षा, सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील सर्व नगरसेवक व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरले. व्यापाऱ्यांना पूर्वसूचना आणि अल्टिमेटम न देता थेट कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी प्रशासनावर केला. तसेच नगरसेवकांना विश्वासात न घेता ही मोहीम राबवण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कारवाईच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. व्यापाऱ्यांना वेळ देऊन, पर्यायी व्यवस्था करून मगच अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करण्यात आली. या दरम्यान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी रस्ते मोकळे ठेवणे आवश्यक असल्याची भूमिका प्रशासनाकडून मांडण्यात येत आहे. मात्र, या कारवाईमुळे व्यापारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अतिक्रमण हटाव मोहिमेला अप्रत्यक्षपणे राजकीय विरोध होत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
