श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील धोरजा गावाला अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील विविध समस्या जाणून घेत शासकीय निधीच्या वापराचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
रस्ते, पाणी आणि विजेच्या प्रश्नांवर चर्चा
बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी गावातील प्रमुख अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यामध्ये खराब झालेले रस्ते, पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीसाठी पाण्याची समस्या तसेच वारंवार होणारा विजेचा लपंडाव या प्रश्नांचा समावेश होता. ग्रामस्थांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बाबींची सविस्तर नोंद घेतली.
जिल्हा व राज्य पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन
यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले की, “ग्रामस्थांनी मांडलेल्या ज्या समस्या जिल्हा पातळीवर सोडवता येतील त्या तातडीने निकाली काढल्या जातील. तसेच राज्य शासनाच्या अखत्यारीतील प्रश्नांसाठी वरिष्ठ पातळीवर स्वतः पाठपुरावा करून गावाच्या विकासासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.”
तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यावेळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणीताई फराटे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी, गट शिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी, नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांच्यासह पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
