जत :
राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या ‘स्टिंग’ (Sting) या उत्तेजक पेयाच्या सेवनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांच्या परिसरापासून ५०० मीटर अंतराच्या आतील दुकानांमध्ये ‘स्टिंग’ पेयाची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या निर्णयाची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘डॅशिंग’ आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नियुक्तीने भेसळदारांमध्ये खळबळ
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर राज्यातील भेसळखोर आणि नियमबाह्य विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दुधातील भेसळ, गुटखा विक्री आणि नियमबाह्य कोल्ड्रिंक विक्री करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकारचा निर्णय
‘स्टिंग’ हे उत्तेजक पेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असून त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलांमध्ये अशा पेयांच्या वाढत्या सेवनामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळांच्या ५०० मीटर परिसरात या पेयाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचे राज्यभरातील पालकवर्ग, शिक्षक आणि सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई
शाळा परिसरापासून ५०० मीटरच्या आत ‘स्टिंग’ पेयाची विक्री करताना दुकानदार आढळल्यास संबंधितांवर थेट कायदेशीर कारवाई तसेच माल जप्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जत शहरासह ग्रामीण भागात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी कशी केली जाते आणि छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
