खटाव प्रतिनिधी
खटाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून असलेली पावसाची प्रतीक्षा अखेर संपली असून, गेल्या दोन दिवसांपासून नेर परिसरासह डिस्कळ भागात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. शामगाव घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, तरसवाडी घाट परिसरातही पावसाने जोर धरला आहे.
डोंगराळ भाग असल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली असली, तरी अनेक भागांत अद्यापही पेरणी बाकी आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, खरीप हंगामाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील ऊस व आले यांसारखी पिके पाण्याअभावी वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, कृषी विभागाने प्रत्येक गावात भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, पिकांची पाहणी करावी तसेच आवश्यक मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
