भाजप नेते अनिल वाघ यांचा आमदार किशोर पाटील यांना थेट सवाल
भडगाव प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्याचार व हत्या प्रकरणातील पीडितेला अवघ्या ६० दिवसांत न्याय मिळतो, मग गोंडगाव येथील बालिकेला तब्बल तीन वर्षांनंतरही न्याय का मिळत नाही? असा संतप्त सवाल भाजप नेते अनिल वाघ यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक आमदार म्हणून ही नैतिक जबाबदारी असताना संवेदनशील प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याऐवजी आमदारांकडून भाजप पदाधिकाऱ्यांवर आरोप केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
भडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत अनिल वाघ बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वाघ म्हणाले की, २०२३ मध्ये ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी सर्वांनी मिळून गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी आमदारांवर सोपवली होती. मात्र, आजही प्रकरण प्रलंबित असताना लोकप्रतिनिधी म्हणून शासनाला जाब विचारण्याऐवजी आमच्यावरच आरोप केले जात आहेत, ही दुर्दैवी बाब आहे.
पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :
- घटनेनंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन तातडीची मदत केली होती.
- तत्कालीन मंत्री अनिल पाटील यांनीही कुटुंबाला सहकार्य केले होते.
- पीडित कुटुंबाला घरकुल देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले होते; त्याचे पुढे काय झाले, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
- गोंडगावच्या बालिकेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील, तालुकाध्यक्ष विनोद नेरकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)चे हर्षल पाटील, किरण शिंपी, प्रदीप पाटील, निलेश पाटील, देविदास पाटील, विशाल चौधरी, आबा महाजन, सोनू पाटील, सचिन पवार, अशोक पाटील, कार्यालयीन प्रमुख कुणाल पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
