मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अविनाश ठाकरे यांची निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी
परभणी, दि. ३ : आधुनिक समाजक्रांतीचे अग्रदूत क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले या उभयतांना संयुक्तपणे मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अविनाश ठाकरे यांनी हे निवेदन सादर केले. महात्मा फुले दांपत्याने सामाजिक समता, स्त्रीशिक्षण, शोषित-वंचितांच्या उन्नतीसाठी केलेले ऐतिहासिक कार्य तसेच भारतीय समाजजीवनात घडवून आणलेली परिवर्तनाची चळवळ लक्षात घेता त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती अविनाश ठाकरे यांनी दिली. अविनाश ठाकरे हे माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी महामंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दर्जाचे माजी उपाध्यक्ष तसेच केंद्र सरकारच्या महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी महोत्सव उच्चस्तरीय समितीचे सदस्य आहेत.
