ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने अपील निष्प्रभ; गुणदोषांवर निर्णय टाळला
अतिरिक्त विभागीय आयुक्तांचा आदेश; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधातील अपील कामकाजातून काढले
बारामती | प्रतिनिधी
झारगडवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीतील पाच सदस्यांना अपात्र ठरविण्याच्या मागणीवरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढतीचा शेवट अखेर संबंधित सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने झाला आहे. सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले अपील “निष्प्रभ” (Infructuous) ठरवत अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी गुणदोषांवर कोणताही निर्णय न देता प्रकरण कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
झारगडवाडी येथील युवराज पांडुरंग पोटे यांनी ग्रामपंचायत सदस्य पद्मनाथ जनार्दन निकम, प्रशांत कांतीलाल बोरकर, अनिता तुळशीराम जाधव, कल्पना हनुमंत झारगड आणि मोनाली विजय राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १४(ह) व १६ अन्वये अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. ग्रामपंचायतीकडे असलेली कथित कर थकबाकी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर तरतुदींच्या आधारे ही याचिका दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात जिल्हाधिकारी, पुणे यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी अपात्रतेची मागणी फेटाळून लावली होती. त्या निर्णयाविरोधात अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान अपीलार्थी उपस्थित राहिले, तर काही जाब देणाऱ्यांच्या वतीने लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला. सर्व कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी (भा.प्र.से.) यांनी आदेश दिले.
आदेशात नमूद करण्यात आले आहे की, झारगडवाडी ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे संबंधित सदस्यांना अपात्र ठरविण्याच्या मागणीवरील अपीलाचा प्रत्यक्ष परिणाम उरलेला नसल्याने ते निष्प्रभ ठरते. त्यामुळे अपात्रतेच्या मुद्द्यावर गुणदोषांवर निर्णय देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत अपील कामकाजातून काढून टाकण्यात आले.
या निर्णयामुळे प्रकरणाचा प्रशासकीय शेवट झाला असला, तरी संबंधित सदस्य अपात्र होते किंवा नव्हते याबाबत अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी कोणताही अंतिम निष्कर्ष नोंदविलेला नाही. त्यामुळे मूळ अपात्रतेच्या प्रश्नावर न्यायनिर्णय झालेला नसून, केवळ कार्यकाळ संपल्याने अपील निकाली निघाले आहे.
चौकट
कलम १४(ह) काय सांगते?
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १४(ह) नुसार, ग्रामपंचायतीकडे किंवा जिल्हा परिषदेकडे देय असलेला कर अथवा फीची रक्कम कायद्यातील मुदतीत न भरल्यास संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकते. मात्र, या प्रकरणात सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्या मुद्द्यावर अंतिम निर्णय देण्यात आलेला नाही.
