अॅड. सुर्यकांत पवार यांच्या दमदार युक्तिवादाने फिर्यादी पक्षाला मोठा दिलासा
बीड | प्रतिनिधी
पाडळी येथील भिल्ल समाजातील शंकर बरडे यांच्या गाजलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत मुख्य आरोपी हरिभाऊ पाखरे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या निर्णयामुळे आरोपी पक्षाला मोठा धक्का बसला असून, मृत शंकर बरडे यांच्या कुटुंबीयांमध्ये न्याय मिळण्याची आशा अधिक बळकट झाली आहे.
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाच्या वतीने अॅड. सुर्यकांत पवार यांनी सखोल आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम युक्तिवाद मांडला. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, तपासादरम्यान समोर आलेले महत्त्वाचे पुरावे, साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची शक्यता तसेच आरोपीला जामीन मंजूर झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, या सर्व मुद्द्यांकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
अॅड. पवार यांच्या प्रभावी मांडणीची दखल घेत न्यायालयाने मुख्य आरोपी हरिभाऊ पाखरे याचा जामीन अर्ज फेटाळून लावत तपास आणि न्यायप्रक्रियेला महत्त्वपूर्ण बळ दिले. न्यायालयाच्या या निर्णयाचे फिर्यादी पक्षासह परिसरातून स्वागत करण्यात येत असून, या खून प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात अॅड. सुर्यकांत पवार यांना अॅड. शेख इम्रान, अॅड. पंकज रायभोळे आणि अॅड. शेख अनवर यांनी मोलाचे सहकार्य केले.
