बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
फलटण | प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील मिरढे गाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या वारंवार गावाच्या हद्दीत शिरत असून, त्याने अनेक पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत.
रात्रीच्या वेळी बिबट्या घरांच्या आणि वस्तीच्या परिसरात येत असल्याने नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळनंतर बाहेर पडण्यास नागरिक धास्तावले असून, शेतातील कामे करतानाही खबरदारी घ्यावी लागत आहे.
ग्रामस्थांनी वन विभागाकडे वारंवार तक्रारी करून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा तसेच परिसरात नियमित गस्त घालून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, बिबट्याचा वावर आढळल्यास त्वरित माहिती देण्याचे सांगितले आहे. बिबट्यामुळे परिसरात भीतीचे सावट कायम असून, वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
