तत्पर बचावकार्याचे सर्वत्र कौतुक
रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात ट्रेलरचा भीषण अपघात झाल्यानंतर मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या चालकाला रत्नागिरी पोलीस दलाने वेळेवर धाव घेत सुखरूप बाहेर काढत त्याचे प्राण वाचविले. पोलिसांच्या या तत्पर आणि धाडसी बचावकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निळकंठ बगळे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करून चालकाला धीर दिला. त्यानंतर रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने समन्वित बचावकार्य सुरू करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली आणि पुढील उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रत्नागिरी पोलीस दलाच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे एक मौल्यवान जीव वाचला. आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी दाखविलेली तत्परता, धाडस आणि समन्वय यामुळे पुन्हा एकदा रत्नागिरी पोलीस दलाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या या कार्याबद्दल नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
