रश्मिताताई पोपेटा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; पनवेलच्या शिवाजी चौकातून मोर्चाची सुरुवात
खारपाडा पेण | प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत शासनाकडून होत असलेल्या विलंबाविरोधात समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या पार्श्वभूमीवर येत्या ८ जुलै रोजी विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते दिबाप्रेमी नामकरण समितीच्या बॅनरखाली होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व रश्मिताताई पोपेटा करणार आहेत.
रश्मिताताई पोपेटा यांनी रुग्णालयात उपचार सुरू असतानाही आंदोलन सुरू ठेवले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली दिबा प्रेमींनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि नारळ वाढवून मोर्चाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रमुख सदस्य तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा एसटी स्टँडमार्गे कळंबोलीकडे आणि तेथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. या मोर्चात सुमारे १५ हजार आंदोलक सहभागी होतील, असा दावा आयोजकांनी केला आहे.
पनवेल, उरण, पेण, अलिबाग, रोहा, खालापूर, कर्जत, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, वसई, विरार, पालघर आदी भागांत गाव बैठका घेऊन आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. महिला संघटना, कलाकार संघटना, बैलगाडा संघटना, २७ गाव संघटना, १० गाव संघटना, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, औषध विक्री संघटना तसेच आगरी समाज संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी सांगितले की, कोविड काळात राज्य सरकारविरोधात आंदोलने झाली; मात्र विमानतळ नामकरणाच्या प्रश्नावर महायुती सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. “८ जुलैचे आंदोलन अभूतपूर्व ठरेल,” असा दावा त्यांनी केला.
या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, कोकण आयुक्त रुबल अग्रवाल, पनवेल तहसीलदार मिनल भामरे-भोसले यांच्यासह संबंधित प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे माहिती देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
या आंदोलनात रश्मिताताई पोपेटा, खासदार बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहरशेठ भोईर, उरणच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
