वेताळवाडी, ता. माढा | प्रतिनिधी
वेताळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील भोताली अंगणवाडी परिसरात गटारीचे व तळ्याचे स्वरूप निर्माण झाल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे साचलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अंगणवाडीच्या जवळच मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे अंगणवाडीतील लहान मुले तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे जवळील घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक जण आजारी पडत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
पावसाळ्याच्या दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होत असून, अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सदर परिसरातील साचलेले पाणी तात्काळ काढून गटारीची स्वच्छता करावी, नियमित फवारणी करावी तसेच आरोग्यविषयक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
