प्रतिनिधी :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी रश्मिता पोपेटा यांनी सुरू केलेल्या ११ दिवसांच्या आमरण उपोषणाची अखेर आमदार रोहित पवार यांच्या मध्यस्थीने सांगता झाली. रश्मिता पोपेटा यांनी आईच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण मागे घेतले.
मात्र, नामकरणासाठीचा लढा कायम राहणार असून, ८ जुलै रोजी पनवेल ते मुंबई विधानभवनावर काढण्यात येणारा आंदोलन मोर्चा पूर्वनियोजितप्रमाणेच होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
रश्मिता पोपेटा यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे आगरी-कोळी समाजात मोठी चळवळ उभी राहिली असून, “दि. बा. पाटील” यांच्या नावासाठीचा लढा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. “रश्मिता ताईंनी पेटवलेली आंदोलनाची चिंगारी आता मशालीच्या रूपाने विधानभवनावर धडकणार आहे,” अशी भावना आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या मोर्चात रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी परिसरातील आगरी-कोळी भूमिपुत्र मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत असून, सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
