कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत अवघ्या २४ तासांत तब्बल १३ फुटांनी वाढ झाल्याने नदीकाठची अनेक मंदिरे पाण्याखाली गेली असून, जिल्ह्यातील पाच बंधारेही जलमय झाले आहेत.
पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लघू व मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असून, यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदीवरील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदाच्या हंगामात प्रथमच कोल्हापूरातील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे प्रयाग-चिखली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून धरण सध्या २१ टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी आणि शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच कासारी नदीवरील यवलूज बंधाराही जलमय झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, कोयना धरणात ७,५८५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. मात्र, अद्याप अलमट्टी धरणामध्ये विशेष आवक झालेली नाही. हिप्परगी धरणात सध्या २०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
सततच्या पावसामुळे जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
