प्रतिनिधी :-
कुरुंदवाड : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सतत पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून अनेक बंधारे पाण्याखाली जाऊ लागले आहेत. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पेरण्या, लावण्या आणि मशागती खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा तेरवाड बंधारा शनिवारी सकाळी पाण्याखाली गेला आहे.
बंधारा पाण्याखाली गेल्याने मळी भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. तसेच नदीपलीकडे शेती असलेल्या शेतकऱ्यांना कुरुंदवाड-शिरढोण पुलाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा लागत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. यापूर्वीही अनेक बंधारे पाण्याखाली गेले होते. शनिवारी सकाळी तेरवाड बंधाराही जलमय झाला.
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून तेरवाड बंधाऱ्यात अडकून पडलेली जलपर्णी आता पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून पुढे आली असून ती कुरुंदवाड-शिरढोण पुलाला अडकली आहे. तसेच पुलाजवळील गवताच्या कुरणामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय कुरणातील गवताचे नुकसान होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. ही जलपर्णी लवकरात लवकर वाहून गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कुरुंदवाड-शिरोळ जुना रस्ता शुक्रवारी शिरोळ बंधाऱ्यावर पाणी आल्याने बंद करण्यात आला होता. शनिवारी शिवतीर्थजवळील अनवडी पुलावरही नदीचे पाणी आल्याने हा रस्तादेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
