गोदाकाठ साखर कारखान्याकडून तब्बल चार कोटी रुपये थकीत; शेतकरी आर्थिक संकटात
पाथरी | प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील गोदाकाठ साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिलाची रक्कम मिळत नसल्याच्या निषेधार्थ हदगाव बुद्रुक आणि कासापुरी सर्कलमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवार, दि. २ जुलैपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हदगाव बुद्रुक व कासापुरी सर्कलमधील अडीचशेहून अधिक शेतकऱ्यांचा ऊस गोदाकाठ साखर कारखान्याने १ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ या कालावधीत गाळपासाठी घेतला होता. मात्र, गाळप होऊन पाच महिने उलटूनही संबंधित शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नाही.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जवळपास चार कोटी रुपयांची ऊस बिलाची रक्कम कारखान्याकडे थकीत असून त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेती खर्च, बँक कर्ज, खत-बियाणे तसेच दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
थकीत ऊस बिलाची संपूर्ण रक्कम व्याजासह तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जोपर्यंत ऊस बिलाची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रशासनाने आणि संबंधित साखर कारखान्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
