तेल्हारा प्रतिनिधी
पिवंदळ बु. परिसरातील निंभोरा व तळेगाव डवला शेतशिवारात रानडुकरांच्या कळपाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात शिरलेल्या रानडुकरांनी पेरणी केलेली तूर फस्त केल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून बळीराजा हतबल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून जंगलालगतच्या शेतशिवारात रानडुकरांचा वावर वाढला आहे. काल रात्री रानडुकरांच्या मोठ्या कळपाने पिवंदळ बु. परिसरातील अनेक शेतांमध्ये प्रवेश करून तुरीच्या पिकाची नासधूस केली. सकाळी शेतकरी शेतावर गेल्यानंतर त्यांना संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले.
महागडी बियाणे, खते आणि मशागतीसाठी कर्ज काढून शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली होती. पीक जोमात असल्याने यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र रानडुकरांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. प्राथमिक अंदाजानुसार परिसरातील शेतकऱ्यांचे एकूण लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी संदीप गिल्ले म्हणाले, “रात्रभर जागून पिकाची राखण करावी लागते. तरीही डुकरांचे कळप एवढे मोठे असतात की त्यांना पळवून लावणे कठीण जाते. आमचे अतोनात नुकसान झाले आहे.”
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून वन विभाग व कृषी विभागाने तात्काळ पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
तसेच रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आर्त मागणीही शेतकरी करत आहेत.
