शहादा | प्रतिनिधी
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असताना, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर आणि परिसरात मात्र पावसाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. मंगळवारी दिवसभर आभाळ भरून आले असले तरी केवळ हलक्याच सरी कोसळल्याने शेतकरी आणि नागरिकांची निराशा झाली.
शेजारच्या धुळे जिल्ह्यात हवामान विभागाच्या यलो अलर्टनंतर समाधानकारक पाऊस झाला. मात्र शहादा तालुक्यात अपेक्षित पर्जन्य न झाल्याने खरीप हंगामावर संकटाचे ढग दाटले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर असताना शहादा तालुका मात्र कोरडाच राहिला आहे.
तालुक्याची जीवनवाहिनी मानली जाणारी गोमाई नदी तसेच इतर उपनद्या भर पावसाळ्यातही कोरड्या असल्याचे चित्र आहे. यंदा तालुक्यात अद्याप सरासरीच्या दहा टक्केही पाऊस झालेला नसल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.
पावसाअभावी खरीप पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी धाडस करून पेरणी केली आहे, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले असून सर्वांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.
पुढील दोन ते तीन दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
