नवी दिल्ली
दक्षिण दिल्लीतील तुघलकाबाद एक्स्टेंशन परिसरात पाच मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेमागे वैयक्तिक वैर आणि आर्थिक वादातून रचलेला कट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे.
१५ जून रोजी पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. मृतांमध्ये ७० वर्षीय सुशीला देवी, त्यांचा २८ वर्षीय नातू पंकज पांडे आणि २० वर्षीय नात सोनी यांचा समावेश आहे. जखमींवर एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने इमारतीत जाऊन आग लावल्याची कबुली दिली आहे. तिला सरिता नावाच्या महिलेने पेट्रोल आणि आगपेटी पुरविल्याचा आरोप आहे. पुढील तपासात निरंजन आणि राजकुमार यांनी जुन्या वैमनस्यातून हा कट रचल्याचे समोर आले आहे.
या कटाचे मुख्य लक्ष्य दीपक यांची स्कूटर होती, जी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ठेवण्यात आली होती. मात्र, आग वेगाने पसरल्याने संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात सापडली आणि मोठी जीवितहानी झाली.
दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इमारत अरुंद गल्लीत असल्यामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्या. तसेच इमारतीत आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. फुटेजमध्ये आग लागण्यापूर्वी एक महिला इमारतीत प्रवेश करताना दिसल्याने तपासाला दिशा मिळाली.
या प्रकरणी आरोपींवर गुन्हेगारी कट, सदोष मनुष्यवध, हत्येचा प्रयत्न, आगीद्वारे नुकसान करणे आणि रात्री घरात घुसखोरी यांसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली असून, निवासी इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

