📍 मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील लोकल रेल्वेमध्ये पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर फास्ट लोकलमध्ये दार बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पावसामुळे डब्यात पाणी येत असल्याने काही प्रवाशांनी लोकलचे दार बंद करण्याचा प्रयत्न केला. यावरून प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेत २२ वर्षीय मयंक लोहार याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून, संबंधित प्रवाशांची चौकशी करण्यात येत आहे. नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी, प्रवाशांमधील वाढते वाद आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे प्रवास कितपत सुरक्षित आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दररोज लाखो प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे चित्र आहे.
या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लोकलमध्ये सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
